कोपरगाव शहरातील आंबिकानगर आणि गरिमानगरी भागातील प्रलंबित ड्रेनेज व रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांचा संताप दहा दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Shramik News

Breaking

Thursday, May 8, 2025

कोपरगाव शहरातील आंबिकानगर आणि गरिमानगरी भागातील प्रलंबित ड्रेनेज व रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांचा संताप दहा दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


 

कोपरगाव - कोपरगाव शहरातील आंबिकानगर,गरिमानगरी वॉर्ड क्रमांक ५ मधील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, ड्रेनेज, गटार, लाईटिंग आदी कामे दीर्घकाळापासून रखडलेली असून, वारंवार विनंत्या करूनही नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा एकत्र येत कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले असून, लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.पावसाळा तोंडावर असताना या समस्या सुटणे आवश्यक असल्याचे मानले जाते आहे.


आमदार आशुतोष काळे यांचा दोन दिवसांपुर्वी जनता दरबार हा केवळ औपचारिकता होता.सद्या नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा कार्यकाळ संपला असल्याने गेले अनेक कालावधी जनतेच्या मूलभूत सुविधा प्रशासक काळात देखील सोडविण्यात आमदार महोदयांना पूर्णतः अपयश आले आहे. शहराला होणारा पाणीपुरवठा गाळमिश्रीत आणि उशिराने होत असल्याने हेच का जनतेच्या मतांचे फलित असा प्रश्न निर्माण होतो आहे.


मुख्यतः या भागात गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी साचते, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या असून, पथदिवे नसल्यामुळे अंधारात वावरणे कठीण झाले आहे. याशिवाय, महिलांना व वृद्धांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, वारंवार निवेदन देऊनही कामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.


प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत असून, त्यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, जर पुढील १० दिवसांत रस्ते व ड्रेनेजची कामे सुरू झाली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील. हा विषय केवळ नागरी सुविधांचा नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलून कामे सुरू करावीत, अन्यथा याची जबाबदारी प्रशासनावरच राहील.


यावेळी जगदीश मोरे, संदीप चोळके, अनिल गोडसे, महेश पवार, एकनाथ झाबंरे, राजू यादव, नितीन गिरमे, योगेश शिरसे, तुषार जेजुरकर, अंकुश शिरसे, शिवाजी औताडे, संजय वाघ, धर्मा आव्हाड, सागर दळवी, सतीश गाडे, सुधाकर शेळके, मच्छिंद्र गोर्डे, ठोंबरे साहेब, संदीप राऊत, मुक्तार पठाण, रामनाथ शिंदे, इसाकभाई तांबोळी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages