उपकार विसरणाऱ्यांची प्रवृत्ती ही अल्पावधीची हा इतिहास ताजा – विजय डांगे - Shramik News

Breaking

Tuesday, May 27, 2025

उपकार विसरणाऱ्यांची प्रवृत्ती ही अल्पावधीची हा इतिहास ताजा – विजय डांगे


 

काकडी - काकडी ग्रामपंचायतीच्या राजकारणात सध्या वैयक्तीत स्वार्थापोटी काही पदाधिकाऱ्यांच्या दलबदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना कोल्हे गटाचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य विजय डांगे यांनी परखड शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. "काही भूछत्र सोडून गेल्याने त्याचा सूर्यावर परिणाम होत नाही. तसाच काही पदाधिकारी गट सोडून गेले म्हणून कोल्हे गटावर परिणाम होणार नाही, या उलट जोमाने पक्षवाढीसाठी अनेकांना संधी मिळाली आहे" असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.


डांगे पुढे म्हणाले, “युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अनेक अशा व्यक्तींना शून्यातून सत्तेच्या गादीवर बसवलं, ज्यांचा सामाजिक आधार फारसा नव्हता. त्यांनी गावच्या विकासासाठी कोल्हे गटात राहून काम केल्याचं नाटक केलं, पण प्रत्यक्षात मात्र स्वार्थाचा भोपळा फोडत आपली खोटी ओळख निर्माण केली जी सध्याच्या घडल्या प्रकाराने उघड पडली आहे.


कोल्हे कुटुंब हे केवळ राजकीय नेतृत्व नव्हे, तर कार्यकर्ते घडवण्याचे केंद्र आहे. डांगे यांनी ठामपणे सांगितले की, “आजवर कोल्हे गटातून तयार झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना अन्य गटांनी फोडाफोडीतून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला त्यावरच स्वतःचे राजकारण जोपासले. मात्र, संधीसाधू हे केवळ हंगामी भूछत्र असून पावसाळा संपला की नाहीसे होतात, तशीच या दलबदलूंचीही अवस्था होणार आहे.”


गावाच्या विकासासाठी निस्वार्थ काम करणाऱ्या विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजही असंख्य कार्यकर्ते एकनिष्ठपणे उभे आहेत. याचबरोबर उपकार विसरणाऱ्यांची प्रवृत्ती ही समाजात दीर्घकाळ टिकत नाही, असा टोला विजय डांगे यांनी लगावला.राजकारणात सत्तेच्या मोहापेक्षा निष्ठा, मूल्य आणि सेवा महत्त्वाची असते. हे विसरून स्वतःच्या वैयक्तीत स्वार्थासाठी पाऊल उचलणाऱ्यांना काकडी ग्रामस्थ आणि वेळच योग्य उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Pages