कोपरगाव प्रतिनिधी - राज्यामध्ये विधानसभेचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार विविध पक्षांच्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत. अगदी पक्ष बदलण्याची वेळ आली तरी चालेल पण मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे त्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. सध्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत. त्यांची उमेदवारी ही नक्की मानले जात आहे परंतु राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या काही धोरणामुळे तालुक्यातील बेरोजगारी, रस्ते वीज हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. शिवाय ते भाजपा सोबत असल्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, मागासवर्गीय यांची मते त्यांना मिळतीलच असे नाही. कारण भाजपाने संविधान विरोधी चालवलेला अजेंठा हा कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे यांच्या रूपाने एक आश्वासक चेहरा मतदारांसमोर आहे. मतदारसंघातील जनतेची इच्छा आहे की विवेक कोल्हे यांनी निवडणूक लढवली पाहिजे. भारतीय जनता पार्टीने कोल्हे घराण्याला दोन-तीन वेळेस शब्द देऊन तो पाळलेला नाही मग आता हा पक्ष दिलेला शब्द पाळेलच याचा विश्वास कार्यकर्ते आणि मतदारसंघातील जनतेला राहिलेला नाही. मागील दारातून जाण्यापेक्षा जनतेतून निवडून गेलेले कधीही सन्मानाचे राहील असेही काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले आहे. राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तर तो स्वतःसाठी घेतलेला निर्णय होईल असा संदेश मतदारसंघात जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरच या नाट्यमय घडामोडीत कोल्हे कुटुंबीय व स्वतः विवेक कोल्हे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.